तिकिटांच्या डावात रंगले नेते ; वाऱ्यावर पडले निष्ठावंत कार्यकर्ते

LiVE NEWS | UPDATE
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
राज्यात निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना राजकारणातील एक कटू वास्तव पुन्हा एकदा ठळकपणे समोर येत आहे. एखाद्या नेत्याला पक्षाकडून तिकीट मिळालं नाही, की तो क्षणाचाही विलंब न करता दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो. कालपर्यंत ज्या पक्षासाठी छातीठोक भाषणं, आंदोलने आणि घोषणाबाजी केली, तोच पक्ष एका झटक्यात परका ठरतो. मात्र, याच राजकारणात पक्षासाठी आयुष्य खर्ची घालणारा सच्चा कार्यकर्ता मात्र आजही त्या पक्षात निष्ठेने उभा आहे.
हा कार्यकर्ता उन्हातान्हात फिरतो, झेंडे उचलतो, सभा-मेळाव्यांची जबाबदारी घेतो, पक्षश्रेष्ठींसाठी वेळ, पैसा आणि श्रम खर्च करतो. पण निवडणुकीचा काळ आला की उमेदवारीच्या चर्चेत त्याचं नाव कुठेच नसतं. नेत्यांना मात्र, पक्ष बदलण्याचा ‘पर्याय’ खुला असतो. कार्यकर्त्यांसाठी मात्र तोच पक्ष आयुष्यभराचा ठरतो. यातून एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो असा निष्ठावान कार्यकर्ता कधी नेता होणार आहे? की नेता थेट आपल्या मुलालाच पुढे करून, घराणेशाहीच्या जोरावर तिकीट मिळवून देण्याचीच परंपरा कायम राहणार?
आज कार्यकर्त्याची भूमिका केवळ पोस्टर लावणं, सतरंज्या टाकणं,-उचलणं, खुर्च्या मांडणं, नेत्यांच्या पुढे-मागे फिरणं इतपतच मर्यादित राहिली आहे. निवडणूक संपली की तोच कार्यकर्ता पुन्हा विसरला जातो. निर्णयप्रक्रियेत त्याला स्थान नसतं, पक्षसंघटनेत त्याचं मत विचारात घेतलं जात नाही. अशा परिस्थितीत कार्यकर्त्याचं भवितव्य तरी काय? असा प्रश्न निर्माण होतो.
राजकारण हे जनतेसाठी, समाजासाठी असायला हवं होतं मात्र, सध्याच्या परिस्थितीत ते अनेक ठिकाणी वैयक्तिक सोयीसाठी खेळलं जात असल्याचं चित्र दिसत आहे. तळागाळात राबणारा कार्यकर्ता आजही गाळातच अडकून पडलेला आहे तर वरच्या पातळीवर बसलेले नेते मात्र, सतत सुरक्षित राजकारण करताना दिसतात.
आपल्या वार्डात, विभागात किंवा गावात ठोस काम नसतानाही केवळ ‘सेटिंग’च्या जोरावर पुढे येणाऱ्यालाच नेता मानायचं का ? असा सवाल कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात आहे. ही अस्वस्थता आता उघडपणे व्यक्त होऊ लागली असून, राजकीय वर्तुळात त्याची दखल घेणं अपरिहार्य ठरत आहे.
आता तरी पक्षाच्या वरच्या फळीने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. खरोखर पक्षासाठी कोण झिजतो? कोण काम करतो? याची प्रामाणिक चाचपणी व्हायला हवी. निष्ठावान कार्यकर्त्याला केवळ पोस्टरपुरतं मर्यादित न ठेवता, त्यालाच उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवावं, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.
नाहीतर एक दिवस कार्यकर्ता थेट प्रश्न विचारेल “आम्ही फक्त वापरून फेकायचेच आहोत का?” आणि तो प्रश्न केवळ पक्षांसाठीच नव्हे, तर संपूर्ण राजकारणासाठी घातक ठरू शकतो.
| भविष्यात कार्यकर्त्याविना राहतील राजकीय पक्ष “अलिकडच्या काळात राजकारणात निष्ठेपेक्षा सोयीसुविधा आणि स्वार्थ पाहण्याची प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. भाजपसह सर्वच राजकीय पक्षांमध्ये ज्यांनी पक्षहितासाठी स्वतःला झोकून दिले, संघर्ष केला आणि पक्ष मजबूत केला, त्याच निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. ज्या क्षणी या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे पक्ष बळकट होतो, त्याच वेळी पक्षांचे नेतृत्व सत्तेसाठी पक्षात येणाऱ्या आयारामांच्या स्वागतासाठी हार घेऊन उभे राहते आणि निष्ठावान कार्यकर्त्याला मात्र, विजनवासात जावे लागते. ज्यांची मुळातच निष्ठा नाही, ते पक्षाशी कायम बांधील राहतील याची खात्री कोण देणार? केवळ सत्तेसाठी पक्षात प्रवेश करणारे आयाराम उद्या पुन्हा दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत, याची हमी कोण देईल? या आयाराम-गयाराम धोरणामुळे निष्ठावान कार्यकर्तेही हळूहळू पक्षापासून दुरावतील आणि याचातून भविष्यकाळात एकच भाकीत पुढे येते—सत्तेच्या साठमारीत अडकलेले राजकीय पक्ष अखेरीस कार्यकर्त्यांविना एकटेच पडतील. कारण निष्ठावानांना डावलणे हे कोणत्याही पक्षासाठी दीर्घकाळ सोपे नाही.“ |