वाशिम जिल्ह्यात विकासकामांचा महापूर ; स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री भरणे यांचे आश्वासन

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
वाशिम जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ७८वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ध्वजारोहण करून जिल्ह्यातील विविध विकासकामांची माहिती दिली आणि आगामी काळात विकासाची गती अधिक वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला.

भरणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १७,९९१ घरे बांधून पूर्ण झाली असून लाखो घरांना मान्यता देण्यात आली आहे. रमाई, शबरी आणि मोदी आवास योजनांतर्गतही घरांची उभारणी करण्यात आली आहे.

कृषी क्षेत्रात प्रगती
पीक विमा योजनेंतर्गत कोटींची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. वाशिम जिल्हा चिया लागवडीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे. मनरेगा, फळबाग आणि ‘प्रति थेंब अधिक पीक’ योजनेतून शेतकऱ्यांना कोटींचे अनुदान मिळाले आहे.
महिला सक्षमीकरण
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने जिल्ह्यात ४० हजार ‘लखपती दीदी’ तयार झाल्याची माहिती भरणे यांनी दिली. महिला बचतगटांना विविध योजना व प्रशिक्षणाचा लाभ मिळत आहे.
जलतारा मोहिमेत विशेष यश
जलतारा मोहिमेत वाशिम जिल्ह्याचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. या मोहिमेमुळे पाणी साठवण क्षमता वाढली असून अनेक गावांमध्ये पाणी उपलब्धतेत सुधारणा झाली आहे.
पुरस्कारांची श्रृंखला
आरोग्य सेवेत जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. पोलिस दलाला ‘पोलीस सुधारणा’ पुरस्कार मिळाला असून ‘मिशन आशीर्वाद’ मोहिमेला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे.
सत्कार व लोकार्पण
सदर कार्यक्रमात वीरपत्नी, अधिकारी, स्वयंसेवक व अवयवदान करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध विभागांना चारचाकी वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
भरणे यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी नागरिकांना व अधिकाऱ्यांना आवाहन केले की, “एकत्रित प्रयत्नांतून वाशिम जिल्हा विकासाच्या नवनवीन पायऱ्या चढेल आणि महाराष्ट्र सशक्त बनेल.