ग्रामीण प्रश्नांना न्याय देणाऱ्या सदाशिव पुकळेंना दादासाहेब फाळके पुरस्काराचा मान

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
मिरज | पत्रकारिता क्षेत्रात आपल्या टोकदार वृत्तसंकलनाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे पत्रकार सदाशिव पुकळे यांना दादासाहेब फाळके बेस्ट प्रेस रिपोर्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पत्रकारितेतील सातत्य, प्रामाणिकपणा आणि समाजातील मुलभूत समस्यांना दिलेला आवाज या कार्याची दखल घेऊन दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्डच्या वतीने हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
सन 2014 पासून पुकळे यांनी पत्रकारितेत प्रवेश करून ग्रामीण जीवनातील अनेक पैलूंना न्याय देणारी बातमीदारी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा, सामाजिक अन्याय, विकासातील तुटवडा, शैक्षणिक समस्या, ग्रामविकासातील त्रुटी अशा संवेदनशील मुद्द्यांवर त्यांनी ठोसपणे लेखन केले. ग्रामीण भागातील अडीअडचणींचे वास्तव चित्र उभे करत अनेक प्रश्न शासनदरबारी पोहोचवण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. त्यामुळे त्यांचे वृत्तसंकलन जनतेत तसेच प्रशासनातही चर्चेचा विषय ठरले आहे.
यापूर्वीही विविध संस्थांकडून पुकळे यांच्या उल्लेखनीय कार्याला पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता दादासाहेब फाळके बेस्ट प्रेस रिपोर्टर पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली गेल्याचे समाधान व्यक्त होत आहे.
या कार्यक्रमाला माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, जयवंत सरगर, चंद्रकांत पावणे, संदीप पावणे, मोहन खरजे, नाना मोटे, विवेक पावणे, आण्णा मोटे, सुखदेव पाटील, सुखदेव खताळ आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सौभाग्यवती सोनिया जयकुमार गोरे व साध्य फाउंडेशनच्या अध्यक्षा विद्याताई मोटे यांच्या हस्ते पुकळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी हनुमंत मोटे, बाळासो मोटे, लोकनियुक्त सरपंच सुरज पाटील, गणेश पाटील आदींची उपस्थिती होती.